धरणगाव नगरपरिषदेचा नाशिक विभागात बहुमान

100 दिवसांच्या विशेष कार्यालयीन सुधारणा मोहिमेत प्रथम क्रमांक
धरणगाव (प्रतिनिधी) विनोद रोकडे
धरणगांव – राज्य शासनाच्या 100 दिवसांच्या विशेष कार्यालयीन सुधारणा मोहिमेत धरणगाव नगरपरिषदेनं नाशिक विभागात प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या विशेष कामगिरीबद्दल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामनिवास झंवर व कर्मचारी यांचा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या गौरव समारंभाला जिल्हा सहाय्यक जनार्दन पवार, यावल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निशिकांत गवई, तसेच धरणगाव नगरपरिषद कार्यालय अधीक्षक भिकान पारधी, राहुल तळेले, संतोष बिर्हाडे, महेश चौधरी, निलेश वाणी, गोपाळ चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
सत्कारप्रसंगी जिल्हाधिकारी प्रसाद म्हणाले, “धरणगाव नगरपरिषदेने पारदर्शक, शिस्तबद्ध आणि नागरिकाभिमुख कामकाजाची अंमलबजावणी करत नाशिक विभागात आदर्श निर्माण केला आहे. ही कामगिरी इतर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी प्रेरणादायी आहे.”
मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “हा पुरस्कार केवळ माझा नसून संपूर्ण नगरपरिषद कर्मचारीवर्गाचा व धरणगावच्या नागरिकांचा आहे. त्यांच्या सहकार्यामुळेच आम्ही हे यश संपादन करू शकलो. आगामी काळातही नागरिकाभिमुख, विकासाभिमुख व पारदर्शक कामकाज सुरू ठेवण्याचा संकल्प आम्ही केला आहे.”
या यशामुळे धरणगाव नगरपरिषदेनं नाशिक विभागात एक वेगळी ओळख निर्माण केली असून शहराच्या विकासाच्या दिशेने मोठं पाऊल उचललं असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.


