जळगांव जिल्हा

आचार्यश्री पूज्य जयमलजी म.सा. यांचा 315 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा

जैन हिल्सवर आचार्यांचा जय नामाचा जयजयकार; भक्तिगीतांमुळे भक्तिमय वातावरण

जळगाव दि. 8 – आचार्य सम्राट 1008 पूज्य श्री जयमलजी म.सा. यांच्या 315 व्या जन्मोत्सव जैन हिल्स येथे भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा झाला. यावेळी पारंपारिक वेशभूषेत श्रावक-श्राविकांच्या मधुर भक्तिगीतांसह पूज्य आचार्य जयमलजी म. सा. यांच्या नामाचा जयजयकार करण्यात आला. प्रवचन, मंगलाचरण, स्वागतगीत, भक्तिसंगीत, महामांगलिकने आचार्य जयमलजी म.सा. यांचे स्मरण करत गुरूगायनाने भव्यातिभव्य तिनदिवसीय जन्मोत्सवाचा समारोप झाला.

एक भवावतारी आचार्य सम्राट श्री जयमलजी म.सा. यांचा 315 वा जन्मोत्सवाप्रसंगी जळगाव संघपती दलिचंदजी जैन, अ.भा. श्वेतांबर स्थानकवासी जैन श्रावक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रेवतमल नाहर, माजी खासदार ईश्वरलाल जैन, अशोक जैन, नयनताराजी बाफना, कस्तूरचंदजी बाफना, शंकरलालजी कांकरिया, रमेशदादा जैन, प्रदीप रायसोनी, अजित जैन, अजय ललवाणी, नवरतन बोखाडीया, गौतमचंद कोठारी, जळगावनगरीच्या महापौर जयश्री महाजन, सुशिल बाफना, कांतीलाल कोठारी, सुरेंद्र लुंकड, विजय चोरडिया, विजयराज कोटेचा, अजय राखेचा यांच्यासह जळगाव, धुळे, नंदूरबार, चेन्नई, सिकंदराबाद, मारवाड रायचूर, गुवाहटी, नागोर, जोधपूर, अमरावती, बडनेरा, बोलाराम, म्हैसूर, बेंगलुरू, इरोड, इलकल, इंदौर, सुरत, अहमदाबाद, मारवाड पाली, ब्यावर, सेलम, तिरूतन्नी, गंगावती, तिरूवल्लूर सह संपूर्ण भारतभरातील श्रावक-श्राविका सहभागी झाले होते.

श्री. वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ जळगाव, श्री. अखिल भारतीय श्वेताम्बर स्थानकवासी जयमल जैन श्रावक संघ, ऑल इंडिया जे. पी. पी. जैन महिला फाऊंडेशन, अंहिसा रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत श्री. जयमलजी म.सा. यांच्या 315 व्या जन्मोत्सवाप्रसंगी जयगच्छाधिपती व्याख्यान वाचस्पती, वचन सिद्ध साधक उग्र विहारी, बारावे पट्टधर वर्तमान आचार्य प्रवर 1008 प. पू. श्री पार्श्वचंद्रजी म. सा, एस. एस. जैन समणी मार्गचे प्ररंभ कर्ता अनुप्पेहा ध्यान प्रणेता प्रवचन प्रभावक डॉ. श्री पदमचंद्रजी म. सा, विद्याभिलाषि जयेंद्रमुनीजी म.सा, सेवाभावी जयशेखरमुनिजी म.सा., मौनसाधक श्री. जयधुरंधरमुनिजी म.सा. विद्याभिलाषी श्री जयकलशमुनीजी म.सा., तत्वरसिक श्री जयपुरंदर मुनीजी म.सा ठाणा 7 यांच्यासह समणी प्रमुखा श्री. निधीजीसह ठाणा 6 हे विराजमान होते. त्यांचा उपस्थीतीत पूज्य श्री. जयमलजी म.सा. यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

मुख्य प्रवचनामध्ये तत्वरसिक श्री जयपुरंदर मुनीजी म. सा. यांनी भगवान महावीर यांच्या मार्गावर चालण्यासाठी वीर कुणाला म्हणावे हे सांगितले. कोणतेही कठिणातील कठिण कार्य सहज सोपे करण्यासाठी विरता महत्त्वाची आहे. संकल्प महत्वाचा असून घेतलेल्या संकल्पावर कृतिशीलपणे आचरण करणे तसे जगणे महत्त्वाचे आहे यासाठी आचार्य पूज्य श्री.जयमलजी म.सा. याचे जीवनकार्य अभ्यासणे त्यांचे विचार प्रत्यक्ष जीवनात संस्कारित करणे म्हणजे आचार्यांनी सांगितलेल्या मार्गावर मार्गस्थ होणे होय. मनुष्याला यशस्वी होण्यासाठी अनेक यशाची मंत्रे शिकविणारी पुस्तके, व्याख्याने आहे. ती अभ्यासणेही महत्वाचे आहे, मात्र आपल्या आचार्यांच्या इतिहासाकडे वस्तुनिष्ठ पद्धतीने बघितले तर त्यांनी संघर्ष काळातही समयसूचकतेने घेतलेले निर्णय, त्यावर ठामपणे जगणे हे प्रत्येकासाठी प्रेरणास्रोत आहे. हीच प्रेरणा घेऊन संकल्पमय जीवनाचा मार्ग अवलंबने, आदर्श विचार करून जगणे हीच पूज्य आचार्यांच्या जन्मोत्सावानिमित्त त्यांचे स्मरण करणे होय.

जैन समणी प्रमुखा डॉ. सुयश निधीजी यांनी शासक आणि प्रजा यांचा आचरण व्यवहार भाष्य केले. शासक जसे आचरण करेल तसे आचरण प्रजेमध्ये दिसते यासाठी आचार्यांनी अनेक शासक राज्यांना आपल्या प्रभूवाणीने हिंसा, व्यसनांपासून परावृत्त केले. धर्माला श्रद्धेने जोडले तर बौध्दिक विकास करता येतो तो आचार्यांच्या संस्कारात दिसतो. हा विचार करून प्रत्येकाने विशेषत: युवापिढीने नैराश्यातून आत्महत्येसह सर्वप्रकाराच्या व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे. हाच साधूवाद आचार्यांच्या जन्मोत्सवानिमित्त असल्याचे डॉ. सुयश निधीजी यांनी सांगितले.

जैन समणी श्रुत निधीजी यांनी आचार्यांच्या जन्मोत्सवाच्या तारिख आठ असल्याने आचार्यांना सांगितलेल्या आठ चमत्कारिक मार्गावर चालणे महत्त्वाचे आहे. श्रद्धा आणि भक्तिभावाने मनातील वैराग्य भावना जागृत होते यातूनच संयमी होता येते संयमी होऊन मार्गस्थ होणे थोडे कठिण मात्र आचार्यांचा साधुवाद सोबत असल्याने त्यावर सहज चालता येते.

यावेळी जयगच्छाधिपती 12 वे पट्टधर आचार्यप्रवर प.पु. श्री पार्श्वचंद्र जी म.सा द्वारा महाप्रभावी महा मांगलीकसुद्धा देत आशिर्वाद दिला. यानंतर सामूहिक तेले तप प्रत्याख्यानासह गौतम प्रसादी लाभ हजारो श्रावक-श्राविकांनी घेतला. आचार्यश्री यांचा पुढील चार्तुमासाची विनंती रायचूर, चेन्नई, हैदराबाद, बेंगलुरू, येथील श्रावक-श्राविकांनी केली आहे.

श्री. रेवतमलजी नाहर यांनी मनोगतामध्ये संयम, साधना आणि आस्था यांचा संगम जैन हिल्सवर आचार्यांच्या जन्मोत्सवाच्या आयोजनात दिसत असल्याचे कौतूक केले. ऑल इंडिया जे. पी.पी. जैन महिला फाऊंडेनच्या राष्ट्रीय अध्यक्षा ममता कांकरिया यांनी आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. यावेळी रक्तदान शिबीराचेही आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची प्रस्तावना संघपती दलिचंद ओसवाल यांनी केले. आभार स्वरूपकुमार लुंकड यांनी मानले. सूत्रसंचालन चंदन भंडारी, जोधपूर यांनी केले. सदाग्यान भक्तिमंडल आणि जे. पी. पी. संगीत मंडल यांनी भक्तिगीते सादर केली. यशस्वीतेसाठी जळगाव जैन समाजातील विविध मंडळांनी यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

दानविरांचा सन्मान

आचार्य पूज्य श्री. जयमलजी म.सा. जन्मोत्सवाचे यशस्वी आयोजन, व्यवस्था केल्याबद्दल संघपती दलिचंदजी जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, अजित जैन, सौ. निशा जैन, शोभना जैन, डॉ. भावना जैन व संपूर्ण चोरडिया परिवाराचा जय जापकलश, मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. चोरडीया परिवाराचे मानपत्र पूष्पा भंडारी यांनी वाचले. शंकरलालजी कांकरिया व परिवाराला प्रदान केलेल्या मानपत्राचे वाचन अपुर्वा राका यांनी केले. अजय ललवाणी व परिवाराला प्रदान करण्यात आलेले मानपत्राचे वाचन अनिल कोठारी यांनी केले. राष्ट्रीय अध्यक्ष रेवतमल नाहर यांचा सत्कार ईश्वरबाबुजी ललवाणी यांनी केला. जे. पी. पी. अंहिसा पुरस्काराने ममता कांकरिया यांचा सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *