ताज्या बातम्या

‘मातोश्री’ वर हायव्होल्टेज बैठक ! निवडणुकीवर चर्चेचा अजेंडा ; मात्र वादाला फोडणी !

धरणगाव प्रतिनिधी / विनोद रोकडे

ठाकरेंसमोरगटबाजी उफाळली !

मुंबई : बुधवारी मातोश्रीवर झालेल्या बैठकीत आगामी निवडणुकांवर चर्चेसाठी बैठक बोलविण्यात आली होती. मात्र या बैठकीत निवडणुकांवर चर्चेऐवजी जळगावातील संघटनात्मक वादालाच फोडणी देण्यात आली.

विधानसभेतील पराभवामुळे आधीच मरगळ आलेल्या जळगाव ठाकरे गटात नवीन संघटनात्मक बदलांमुळे अंतर्गत गटबाजी फोफावली आहे. जुन्या पदाधिकाऱ्यांनी यासाठी संपर्कप्रमुख यांच्या तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे बुधवारी (दि.२) मातोश्रीवर झालेल्या बैठकीत आगामी निवडणुकांवर चर्चेऐवजी जळगावातील संघटनात्मक वादालाच फोडणी देण्यात आली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गटबाजीच्या विषयावरून जळगांव जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांचीही कानउघडणी करीत संघटना मजबूत करण्यावर लक्ष देण्याच्या सूचना केल्या.

जळगावात ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख म्हणून कुलभूषण पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र विधानसभेत पक्षाच्याच अधिकृत उमेदवारासमोर बंडखोरी करून निवडणूक लढविणाऱ्या पाटील यांच्या नियुक्तीमुळे ठाकरे गटातील गटबाजी उफाळली आहे. यात संजय सावंत यांच्यावर अनेक जुन्या पदाधिकाऱ्यांनी पक्षपातीपणाचे आरोप केले. बैठकीत संपर्कप्रमुख संजय सावंत, लोकसभा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील, जिल्हा संघटक करण पवार, पीयूष गांधी, नीलेश चौधरी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

धरणगावात मंगळवार (दि.१) रोजी झालेल्या पदाधिकारी बैठकीत वादाची ठिगणी पडली. वरिष्ठ पदाधिकाऱ्यांवर बैठकीत नारजीचा सूर व्यक्त करीत रोष व्यक्त करण्यात आला. तसेच वेळीच वरिष्ठांनी दखल न घेतल्यास सामूहिक राजीनामा देण्याचा इशाराही या बैठकीत देण्यात आला होता. या बैठकीचे सुर मुंबईतील मातोश्री येथे झालेल्या बैठकीत उमटले असून कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *