ताज्या बातम्या

विद्युत तारेमुळे लागलेल्या आगीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

धरणगांव प्रतिनिधि / विनोद रोकडे

धरणगाव – तालुक्यातील बाभळे येथील गट नंबर ५९ मधील शेतात दिनांक २८ एप्रिल २०२५ रोजी सकाळी अंदाजे ९:३० वाजता आग लागली. या आगीत ईश्वर विठोबा महाजन आणि लक्ष्मण विठोबा माळी या दोन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आग विझवण्यासाठी धरणगाव नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले.

विद्युत तारेमुळे ठिणगी पडून आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या आगीत ईश्वर विठोबा महाजन यांच्या दोन हेक्टर क्षेत्रातील ठिबक सिंचनासह चारा आणि जमा करायचा बाकी असलेला मका कणीस जळून खाक झाला, ज्याची अंदाजित किंमत तीन लाख रुपये आहे. तर, लक्ष्मण विठोबा माळी यांच्या दोन हेक्टर बावीस आर क्षेत्रातील ठिबक सिंचनाची पाईपलाईन पूर्णपणे खराब झाली. आगीमुळे सुमारे तीस क्विंटल मक्का आणि तीन लाख रुपये किंमतीचे ठिबक सिंचनाचे साहित्य जळून मोठे नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच महसूल मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पंचानी आगीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून नोंद घेतली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी सांगितले की, या आगीमुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांनी शासनाकडून योग्य भरपाईची अपेक्षा व्यक्त केली आहे. तलाठी यांनी पाहणी अहवाल सादर करत योग्य कार्यवाही करण्याची शिफारस केली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *